दोन गझला : मीनाक्षी गोरंटीवार



१.
आयुष्याचा धागा धागा जुळवत गेले
कधीकधी पण टाक्यासम त्या उसवत गेले..

थोडे म्हणता म्हणता पुष्कळ जगून झाले
जगता जगता जीवन गाणे बहरत गेले...

पाण्यामध्ये जेव्हा पडले तेव्हा मजला
तरणे बिरणे सारे सारे उमगत गेले

जादू झाली तुझी मनावर इतकी अलगद
माझ्या नकळत फूल मनाचे उमलत गेले

जुने पुराणे सगळे पुरले खोल तळाशी
आयुष्याला पुन्हा नव्याने सजवत गेले..

तुझी आठवण कातरवेळी नाचत आली
गालांवरुनी अश्रू घळघळ निखळत गेले

दु:ख मनाच्या आत ठेवले खोल खोल अन्
सुखास  साऱ्या आनंदाने उधळत गेले
 
२.
काळजावर, स्पंदनांवर बोलतो
तू दिलेल्या मी व्यथांवर बोलतो

भंगली स्वप्ने गुलाबी काल जी
त्या सुगंधी आठवांवर बोलतो

व्यर्थ चर्चा भावली नाही मला
मी स्वत:च्या भावनांवर बोलतो

श्वापदांची गस्त येथे वाढली
वासने..मी माणसांवर बोलतो

बेगडी झालीत आता माणसे
व्यर्थ आपण आरशांवर बोलतो
 
मीनाक्षी गोरंटीवार
मु.पो.वणी,
जि. यवतमाळ

3 comments:

  1. सुखास साऱ्या आनंदाने उधळत गेले...

    खूप छान

    बेगडी झालीत माणसे...👌

    ReplyDelete
  2. फार छान गझला!

    ReplyDelete
  3. दोन्हीही गझल छान...

    ReplyDelete